@skdeolankar

@skdeolankar

https://t.me/skdeolankar


सांस्कृतिक निर्वसाहतीकरणाचे प्रतीक

- डॉ. शैलेंद्र देवळणाकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अलीकडेच संयुक्त अरब आमिरातीमधील अत्यंत महत्त्वाचे शहर असणार्‍या अबूधाबी आणि दुबई या महामार्गावर ‘बीएपीएस’कडून बांधण्यात आलेल्या भव्य हिंदू मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी जगभरातून हजारो भाविक उपस्थित होते. या सोहळ्याकडे केवळ विदेशात बांधण्यात आलेल्या एका मंदिराचा उद्घाटन समारंभ म्एव्हढ्या संकुचित दृष्टिकोनातून पाहता येणार नाही. तसेच या मंदिरामुळे भारत आणि संयुत अरब आमिरातीमधील संबंध घनिष्ट होणार आहेत, दोन्ही देशातील व्यापारउदीम वाढण्यास मदत होणार आहे, केवळ याही अर्थाने याकडे पाहता येणार नाही; तर या संपूर्ण मंदिराच्या उपक्रमाककडे अत्यंत व्यापक अशा सांस्कृतिक आणि संकल्पनात्मक दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. अबू मुरीकाह जिल्ह्यात स्थित ही भव्य रचना भारत आणि युएई यांच्यातील अतुट मैत्रीचा पुरावा तर आहेच; पण त्याचबरोबर बहुसांस्क्रिकतावाद,सांस्कृतिक सौहार्द आणि सहकार्याच्या भावनेचे प्रतीक आहे. 

इस्लामिक देशांमध्ये आजघडीला हिंदू मंदिरे नाहीत, अशी स्थिती नाही. युएईमधील दुबईमध्येच चार ते पाच हिंदू मंदिरे आहेत. अन्य देशांमध्येही काही हिंदू मंदिरे आहेत. अशा स्थितीत या मंदिराचे महत्त्व का? याचे कारण संयुत अरब आमिरातीसारख्या सौदी अरेबियाचा अत्यंत जवळचा मित्र असणार्‍या देशाकडे संपूर्ण इस्लामिक जगताचे नेतृत्व करणारा देश म्हणून पाहिले जाते. अशा देशाने भारताला एक हिंदू मंदीर उभे करण्यासाठी २७ एकर जागा देऊ केली आणि या जागेमध्ये भव्यदिव्य असा मंदिराचा प्रकल्प उभारण्यात आला. हे मंदिर गुलाबी राजस्थानी वाळूचा खडक आणि पांढर्‍या इटालियन संगमरवरी दगडापासून बनवलेलं आहे. हे दगड भारतात कोरलेले असून त्यानंतर मंदिराच्या बांधकामासाठी युएई मध्ये नेण्यात आले. अबू धाबीचे क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी २०१५ मध्ये पंतप्रधान मोदीच्या दौर्‍यादरम्यान मंदिराच्या बांधकामासाठी १३.५ एकर जमीन दान केली होती. यानंतर जानेवारी २०१९ मध्ये मंदिरासाठी आणखी १३.५ एकर जमीन दान केली. अशा प्रकारे एकूण २७ एकर जमिनीवर हे भव्य मंदिर उभारण्यात आलं आहे. या मंदिरात विविध देवतांची तीर्थक्षेत्रे असून भारताच्या उत्तर, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भागातील विविध देवतांना समर्पित प्रत्येकी एकूण सात मंदिरे आहेत. यामध्ये श्रीराम आणि सीता, जगन्नाथ, श्री अक्षर पुरुषोत्तम महाराज, तिरुपती बालाजी आणि अय्यप्पा यांचा समावेश आहे. एका इस्लामिक देशामध्ये हिंदू मंदिरासाठी अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यासाठी संपूर्ण प्रकारची शासकीय मदत देणे याकडे बहुसांस्कृतिकतावादाच्या दृष्टिकोनातून पाहावे लागेल. 

भारत सातत्याने या बहुसांस्कृतिकतावादाचा आग्रह धरत आला आहे. पण अलीकडच्या काळात इस्लामिक देशांची यासंदर्भातील भूमिका सकारात्मक होताना दिसत आहे. विशेष म्हणजे, भारत आणि इस्लामिक जग या दोघांनाही पश्चिमी देश आणि पश्चिमी संस्कृतींकडून अनेक प्रकारच्या नाकारात्मक अनुभवांचा सामना करावा लागला आहे. पश्चिमी देश आणि पश्चिमी संस्कृती यांचे प्राबल्य, प्रभाव, त्यांच्या संस्कृतीचे श्रेष्ठत्व जगावर लादण्यासाठी गेल्या काही शतकांपासून केले गेलेले जाणीवपूर्वक प्रयत्न भारतासह इस्लामिक देशही पहात आले आहेत. केवळ पश्चिमी तत्वज्ञान, पश्चिमी संस्कृती, पश्चिमी धार्मिक मूल्येच कशी श्रेष्ठ आहेत आणि अन्य धर्म, धर्मिय, त्यांचे धार्मिक तत्वज्ञान दुय्यम आहे अशा प्रकारची धार्मिक आणि सांस्कृतिक वसाहतवादाची मांडणी करुन मोठ्या प्रमाणावर आशियायी लोकसमूहांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न गेल्या अनेक शतकांपासून झाला. या वसाहतवादी गुलामगिरीच्या मानसिकतेतून संपूर्ण आशियाई खंडाला किंवा दक्षिणेकडच्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न काही मोजक्या आशियाई नेत्यांकडून केला जात असून त्यामध्ये पंतप्रधान मोदींचे नाव अग्रस्थानी आहे. पंतप्रधान मोदी यांचा प्रयत्न हा प्रामुख्याने "सांस्कृतिक निर्वसाहतीकरणाचा"आहे. याला कल्चरल डीकोलनायजेशन म्हटले जाते. पश्चिमी देशांचा दरारा, दबाव, पगडा दूर करून, त्यातून बाहेर पडून आशियाई संस्कृती व धर्माचे विशेष करुन हिंदू धर्माचे महत्त्व जगाला पटवून देण्याचे प्रयत्न अत्यंत गांभीर्याने पंतप्रधान मोदींकडून केले जात आहेत. त्याला सकारात्मक साद इस्लामिक जगताकडून मिळत आहे, ही बाब उल्लेखनीय म्हणावी लागेल. 

यामागचे कारण म्हणजे इस्लामिक जगताच्या एकंदरीतच मानसिकतेमध्ये आता परिवर्तन होत आहे. इस्लामिक जग हे आता भारताकडे केवळ हिंदू देश म्हणून पहात नाही. किंबहुना, पाकिस्तानच्या अपप्रचारामुळे अनेक इस्लामिक देशांची अशी मानसिकता तयार झाली होती की, भारतामध्ये अल्पसंख्यांक मुस्लिम समुदायावर अनन्वित अत्याचार केले जातात. पण आता ती बदलत चालली आहे. तसेच तेलाच्या अर्थकारणापलीकडे जाऊन हे देश आता आर्थिक विकासात्मक बाबींकडे वळत आहेत. इस्लामिक देशांच्या मानसिकतेत बदल होण्यामागे दोन कारणे आहेत. एक म्हणजे पश्चिमी देश सातत्याने इस्लामिक जगतात हस्तक्षेप करत आहे. नेपोलियन बोनापार्टपासून अलीकडे अमेरिकेपर्यंत सातत्याने इस्लामिक जगतामध्ये हस्तक्षेपवादी भूमिका पश्चिमी जगताने घेतली आहे. त्याला अत्यंत कठोर प्रतिक्रिया इस्लामिक जगताने दिली आहे. पश्चिमी संस्कृती श्रेष्ठ आहे असे सांगत ती लादण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला आणि इस्लामिक देशांच्या अंतर्गत कारभारामध्ये, धार्मिक कार्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न जेव्हा झाला तेव्हा इस्लामिक जगताने कडाडून त्याला विरोध केला. नेपोलियन बोनापार्टपासून इराकमध्ये अमेरिकेने केलेल्या हस्तक्षेपापर्यंतचा काळ इस्लामिक जगत कदापि विसरु शकणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे इस्राईलला समर्थन देऊन किंवा त्यांना पश्चिम आशियामध्ये वसवून अमेरिकादी पश्चिमी राष्ट्रांनी ज्याप्रकारे ध्रुवीकरणाच्या राजकारणाला खतपाणी घातले आणि इस्लामिक जगतामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला त्याचाही राग या देशांमध्ये आहे. तिसरीकडे भारताविरोधात कितीही कांगावा केला जात असला तरी काही गोष्टी नाकारता येण्याजोग्या नाहीत. उदाहरणार्थ, भारतामध्ये मुस्लिमांची लोकसंख्या वाढत चालली आहे. २०११ मध्ये झालेल्या शेवटच्या जनगणनेनुसार भारतात मुस्लिमांची संख्या १४ टयांनी वाढली आहे. भारतात जर अल्पसंख्यांकासाठी असुरक्षित वातावरण असते तर मुस्लिमांची संख्या इतका वाढली नसती. इस्लामिक जगतात पश्चिमी देशांचा प्रचंड हस्तक्षेप होत असल्याने अनेक समस्या उद्भवत आहेत, याची जाणीव त्यांना झाली आहे. त्यामुळे भारताची आर्थिक, सांस्कृतिक भूमिका यांबाबत इस्लामिक जग आता गांभीर्याने विचार करु लागले आहे.  अबूधाबीमधील मंदीर हे बहुसांस्कृतिकतावादाचे प्रतीक आहे. दोन विचारसरणी एकत्र नांदू शकतात, हे इस्लामिक जगताला दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. या मंदिराची रचनाही त्यादृष्टीने करण्यात आली आहे . अनेक धर्मियांची प्रतीके त्यामध्ये आहेत. त्यामुळे भारताची हिंदू संस्कृती किती उदार आहे, वसुधैव कुटुम्बकम् ही भारतीय मूल्यांवर आधारलेली विचारसरणी किती व्यापक आहे आणि ती कशा पद्धतीने इतर धर्मियांना स्वीकारणारी आहे, ती कशी बहुसांस्कृतिकतावादावर आधारलेली आहे, हा संदेश जगाला देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. आज भारत ज्या ग्लोबल साऊथचे प्रतिनिधीत्व करत आहे, ते केवळ आर्थिक स्वरुपाचे नसून ते धार्मिक आणि सांस्कृतिक स्वरुपाचेही आहे हे यातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे सातशे कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले म्हणून या मंदिराकडे पाहून चालणार नाही. हे मंदीर भारत आणि इस्लामिक जगतामधील बदलत्या मानसिकतेचे प्रतीक म्हणून पाहावे लागेल. दोन्ही देशांना अत्यंत जवळ आणणारे हे मंदीर आहे. कारण खर्‍या अर्थाने आता भारतीय संस्कृतीची ओळख आता इस्लामिक जगताला होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक असे हिंदू आहेत जे हिंदूंच्या सांस्कृतिक आधाराला जगामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करत नाहीयेत, तर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी संस्थात्मक संरचना उभ्या करत आहेत. अशा स्वरुपाची अनेक मंदीरे येत्या काळात इस्लामिक देशांमध्ये उभी राहिल्यास नवल वाटता कामा नये.

⚡️परराष्ट्र, संरक्षण धोरणातील, आंतरराष्ट्रीय संबंधातील सर्व चालूघडामोडींविषयी, मराठी व इंग्रजीतून माहिती व विश्लेषणासाठी फॉलो करा.


Twitter -

https://twitter.com/skdeolankar?s=09

Instagram -

https://instagram.com/dr.shailendradeolankar?igshid=1dpe34b2p0ai2

Report Page