मुलांना जिंकण्याचे आव्हान

मुलांना जिंकण्याचे आव्हान

महाराष्ट्र टाइम्स संपादकीय

आज दोन वर्षांनी मुले शाळेत येत आहेत. अशा वेळी त्यांची मने जिंकून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, हे सगळ्यांत मोठे आव्हान आहे. ते त्यांच्याशी संवाद साधून आणि जवळीक साधून पेलावे लागेल...

शिल्पा नंदनपवार

करोनाकाळात शिक्षकांना 'करोना योद्धे' संबोधले गेले. शिक्षक नवीन काही तरी शिकले याचे कोण कौतुक केले गेले. कधी नव्हे ते त्यांची सर्वाधिक प्रशंसा झाली; मात्र शिक्षकांसमोरचे खरे आव्हान शाळा सुरू झाल्यावर सुरू झाले आहे. दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच शाळेत आलेल्या या मुलांच्या भावविश्वातून दोन वर्षे पार पुसली गेली की काय, असा प्रश्न पडावा इतकी ही मुले 'कोरी' आहेत. आठवीतल्या एखाद्या सामान्य मुलाच्या क्षमता सहावीतल्या मुलाइतक्याच आहेत, हा अनुभव प्रत्येक शिक्षकाचा सार्वत्रिक अनुभव ठरावा. नेट येत नाही. शिक्षकांचा आवाज अडकतो. पूर्ण फळा दिसत नाही अशा एक ना अनेक कारणांनी शेकडो मुले शाळेतून पळून गेली होती. आजचे चित्र हतबल करणारे आहे. पाचवीतल्या मुलाला अस्खलित वाचता येत नाही. सहावीतल्या मुलाला पट्टीनेही सरळ रेष काढता येत नाही की नववी, दहावीतली मुले तीन तासांत प्रश्नपत्रिका पूर्णपणे सोडवू शकत नाहीत. मुलांना वर्गात एका जागी पस्तीस मिनिटेही बसणे अवघड झाले आहे. इतकेच कशाला, शिक्षक वर्गात आल्यावर उभे राहायचे असते. वर्गातून बाहेर जाताना शिक्षकांची परवानगी घ्यायची असते, इतके सामान्य नियम आज मुले विसरली आहेत. करोनाकाळातील मृतांचा आकडा आपला थरकाप उडवत होता. त्याच काळात विद्यार्थ्यांचे कणाकणाने रोज होत गेलेले हे बौद्धिक, मानसिक, भावनिक मृत्यू शिक्षण व्यवस्थेपुढचे फारच कठोर आव्हान ठरणार आहेत.

दुकाने, शाळा, बागा, विविध वर्गांना लागलेले टाळे उघडले म्हणून लॉकडाउन संपले, असे समजणे भाबडेपणाचे आहे. विद्यार्थ्यांची शिक्षणातली रुची, व्यवस्थेला आवश्यक शिस्तबद्धता, एकाग्रता, इच्छाशक्ती, आत्मविश्वास यांना लागलेले टाळे उघडण्यासाठी नवनव्या किल्ल्या शोधणे, यांत आता शिक्षकांचे कसब पणाला लागणार आहे. मुलांची शैक्षणिक गुणवत्ता हाच शाळेचा टीआरपी, इतका बाजारू विचार करणाऱ्या काही शाळांनी तर शाळा सुरू झाल्या झाल्याच मुलांच्या परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर घेण्याचे घोषित केले आहे. 'आम्ही शिकवले आहे. तुम्हाला यायलाच हवे,' या दुराग्रही भूमिकेतून आयोजित केलेला तो एक फार्स ठरण्याची शक्यता आहे. मुले शाळेत गणवेश घालून आली, म्हणजे ती 'विद्या+अर्थी' असतात, असे कुठे आहे? त्यांनी दप्तर सोबत आणले; पण शिक्षणातली रुची ते घरीच विसरलेले असतात. त्यांच्यासोबत कंपास असेलही; पण वर्तुळ काढायचे कौशल्य हातातून निसटले आहे. मधल्या सुटीत खायचा डबा सोबत आहे; पण शिकायची भूक अजून त्यांना लागली आहे कुठे? अशा परिस्थितीत त्यांच्या परीक्षा घेऊन, त्यांना शाळेने क्रूरपणे उघडे पाडले, तर ते पाप ठरेल.

तुमच्या शाळेत उद्याचा पार्थसारथी वाढतो आहे. घर ही त्याची देवकी असेल, तर शाळेने त्याला घडवणारी यशोदा झाले पाहिजे, हे कायम लक्षात ठेवायला हवे. बदलत्या परिस्थितीत शाळेने पारंपरिक पद्धतीने परीक्षा घेण्याचा अट्टहास सोडला पाहिजे. मुलांचा अभ्यासक्रम कमी करून, त्यांना विषयानुरूप प्रश्नपेढी देणे आणि त्यावरच आधारित परीक्षा घेणे, हा सर्वाधिक व्यवहार्य पर्याय आहे. यामुळे, पुढच्या वर्गात जाताना मुलांना थोडेसेच येईल; मात्र ते बिनचूक असेल. भरघोस गुण मिळाल्याने त्यांच्यात आत्मविश्वास येईल. शिक्षणाची गोडीही वाढेल. त्यामुळेच, प्रत्येक शिक्षकाला त्याच्या विषयाची परीक्षा त्याच्या त्याच्या तंत्राने घेण्याचे स्वातंत्र्य शाळेने द्यावे, हा झाला दुसरा पर्याय. असे झाले, तर नवनवीन परीक्षा पद्धतींचे शोध लागतील. शिवाय, गुणी मुलांचा हिरमोड होणार नाही. दोन वर्षांपासून या मुलांना माणसांचा वाराही लागला नव्हता. त्यांची मानसिक अवस्था कशी असेल? त्यांना आता घाबरवायचे, माणसात आणायचे, की माणसातून उठावायचे, यावर शाळांनी विचार करायला हवा.

भाषा हा विषय शिकविणाऱ्या शिक्षकांना भाषाच शिकवायची आहे ना! मग पाठ्यपुस्तक बाजूला ठेवून गोष्टी सांगू या. कविता म्हणू. कवितेचा अर्थ समजावून मुलांना कवितेवर चित्र काढायला सांगू; त्यामुळे मुलांना व्यक्त करता येईल. त्यांच्या मनाचा निचरा होईल. सामाजिक दूरत्व मुलाखत तंत्राने सांधता येईल. मित्रांशी गप्पांचे संवाद लिहायला सांगून त्यांची मने अनलॉक करता येतील. आवडत्या व्यक्तींना मुलांना पत्र लिहायला सांगू. बघू या तरी त्यांच्या मनात काय दडले आहे? थोडक्यात काय, तर पत्रलेखन, मुलाखत, संवाद, नाटुकली, कथा-कविता, जाहिरात लेखन असे प्रकल्प राबवून मुलांना हस्तलिखित करायला सांगितले आणि त्यावर मुलांचे मूल्यमापन केले, तर ते अधिक खरे असेल. हुशार आणि प्रामाणिकपणे दोन वर्षे अभ्यास केलेल्यांचेही यामुळे नुकसान होणार नाही. उलट यात त्यांचाही कस लागेल.

शिक्षणक्षेत्रात क्रांती घडवून आणणारे सोनम वांगचुक म्हणतात, ते खरे आहे. ते म्हणतात 'रीडिंग, रायटिंग अँड अॅरिथमॅटिक' ही 'तीन आर केंद्रित' प्रणाली आहे इंग्रजांची. त्यांच्यासाठी कारकून घडवणारी. आपण 'तीन एच' केंद्रित प्रणालीने माणूस घडवू. हे तीन एच म्हणजे 'हेड, हँड व हार्ट.' डोक्याला चालना देणाऱ्या प्रकल्पांनी विषयाचा पाया मजबूत होईल. विद्यार्थ्यांना कृतिप्रवण शिक्षणात गुंतवून हस्तकौशल्ये शिकवली, तर देशाची संस्कृतीही जपली जाईल आणि उद्याचा देश आत्मनिर्भर होईल. सर्वांत महत्त्वाचा विकास म्हणजे, शेवटच्या 'एच'चा. अर्थात हार्टचा! आता संपूर्ण अभ्यासक्रमावर परीक्षा घेतली, तर सर्वाधिक नुकसान या 'हार्ट'चे होणार आहे. सामान्य मुलांच्या आत्मविश्वासाचा कणाच यामुळे मोडून पडेल. 'नालायक' म्हणून पालक, शिक्षक त्यांच्यावर सहज शिक्का मारतील. परीक्षेच्या निकालानंतर (आणि आधी भीतीनेही) कदाचित कोवळी मुले आत्मघाताचा पर्याय स्वीकारण्याची भीती आहे. असे झाले, तर मग उरलेच काय? आज मुलांची मने हे सैतानाचे कारखाने झाले आहेत. दोन वर्षांत मुले मोबाइलच्या आहारी गेली आहेत. नको त्या गोष्टींच्या नादी लागली आहेत. मुला-मुलींच्या हादरवून सोडणाऱ्या जवळिकीचे प्रदर्शन अनेक मुलांनी सोशल मीडियावर मांडले आहे. हे सगळे असले, तरी ही मुले आपली आहेत. आज त्यांना शाळेची सर्वाधिक गरज आहे. अशा वेळी पारंपरिक परीक्षा पद्धतीने या हृदयावर शस्त्रक्रिया करायची, की याच काळात विश्वासाने मुलांची हृदये जिंकायची, हा महत्त्वाचा निर्णय आज शाळांना घ्यायचा आहे. खरी परीक्षा शाळेच्या विवेकबुद्धीची आहे. शाळा काय निर्णय घेते, यावरच पुढे शिक्षण संस्थेचे आणि पर्यायाने उद्याच्या भविष्याचे भवितव्य ठरणार आहे.

(लेखिका शैक्षणिक विषयाच्या अभ्यासक आहेत.)



मटाचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

Report Page