चार पिढ्यांची वेधक कहाणी

चार पिढ्यांची वेधक कहाणी

महाराष्ट्र टाइम्स संपादकीय
विवेक गोविलकर

साहित्य अकादमीचा २०२१ या वर्षीचा पुरस्कार मिळालेल्या 'थिंग्ज टू लीव्ह बिहाइंड' या कादंबरीच्या लेखिका नमिता गोखले या एक संपादक, प्रकाशक व जयपूर लिट-फेस्ट या विख्यात साहित्यमेळ्याच्या संस्थापक व आयोजक आहेत. लेखिकेचे लहानपण उत्तराखंडमधल्या नैनितालला गेले. या कादंबरीचे कथानक प्रामुख्याने याच परिसरात घडते. 'द बुक ऑफ शॅडोज' आणि 'अ हिमालयन लव्ह स्टोरी' या आधीच्या दोन कादंबऱ्यांप्रमाणे याही कादंबरीत हिमालयाच्या परिसराचे बारीकसारीक तपशील लेखिकेने आत्मीयतेने दिले आहेत. तीत १८४० ते १९१२ या कालखंडाचे ओघवते चित्र आहे. मात्र, ही ऐतिहासिक घटनांची रटाळ जंत्री नाही. या काल्पनिकेत लेखिकेने ऐतिहासिक घटनांच्या कालक्रमात काहीसे स्वातंत्र्य घेतले आहे.

रेल्वे, वर्तमानपत्र, शिक्षण यातून इंग्रजी सत्तेचा घराघरांत प्रवेश होताना दोन भिन्न संस्कृतीमधला संघर्ष अटळ होता. मात्र, इंग्रजी सत्तेने भारतात पाय रोवल्यानंतर १८५७चे स्वातंत्र्यसमर वगळता व्यावहारिक पद्धतीने विचार करणारे लोक इंग्रजांची सत्ता आणि त्यांचे उच्च सामाजिक स्थान सहजतेने स्वीकारताना दिसतात. ही कथा देविदत्त पंत, त्याच्या विधवा बहिणीची मुलगी तिलोत्तमा, तिची मुलगी देवकी, आणि तिच्या जुळ्या मुली, या चार पिढ्यांची आहे. त्याचबरोबर ही कथा कुमाऊँ प्रांतामधल्या जातिव्यवस्थेच्या उतरंडीची आहे. शस्त्रबळाबरोबर रुग्णसेवा आणि धर्मप्रसार या माध्यमांमधूनही आपला पाया भक्कम करू पहाणाऱ्या इंग्रजांची आहे. एकीकडे सर्व जातींना सामावून घेताना वंश आणि वर्णभेद अधिकच घट्ट करणाऱ्या इंग्रजी सत्तेच्या वास्तवाला लेखिका थेट भिडते.

नैनिताल परिसरात जम बसवताना इंग्रज भल्याबुऱ्या मार्गांचा अवलंब करतात. अशा राज्यकर्त्यांविरुद्ध फारसा असंतोष निर्माण न होण्याचे एक कारण म्हणजे त्या विभागतल्या आधीच्या क्रूर नेपाळी राजाच्या राजवटीच्या तुलनेत इंग्रजांची राजवट तुलनेने दयाळू वाटते. स्थानिक लोकांना आपले मानणारे काही इंग्रज अधिकारी असतात. पण १८५७च्या हिंसाचारात जेव्हा काही इंग्रजांचीही हत्या होते, तेव्हा त्यांना कोण आपले आणि कोण परके हा फरक जाणवतो. यात तिलोत्तमा हे पात्र विशेष लक्षणीय आहे. कामाच्या निमित्ताने तिचा पती सतत बाहेर फिरतो. घरात एकटी असताना ती त्याचे कपडे घालते, कोळशाने स्वतःला दाढी-मिशा रंगवते, चिरूट ओढते. तिला अशा अवतारात पाहून नवरा घरात नसताना तिच्याकडे कोणी गोरा साहेबच आला असावा, अशी शेजाऱ्यांची समजूत होते. ती कोणाची तरी शिकवणी ठेवून संस्कृत आणि अंकगणित शिकते, मोडक्यातोडक्या इंग्रजीत संभाषण करू लागते. वाढत्या वयाबरोबर तिचा आत्मविश्वासही वाढतो. तिचा पती नैनचंद कामानिमित्त प्रदीर्घ काळ घराबाहेर भटकत असताना अनेक वेश्यागृहांना भेटी देतो. पुढे तो डेहराडूनमधल्या दुसरा विवाह करतो आणि तिलोत्तमाला पत्ताही लागू देत नाही. अशाप्रकारे घटना पुढे सरकत राहतात.

तिची मुलगी देवकी हिची त्वचा आणि केस जन्मतःच पांढरेफटक असतात. त्यामुळे तिचा बाप नैनचंद नसून कोणी गोरा साहेब असावा, अशी कुजबूज तिच्या जन्मापासूनच सुरू होते. पंडिता रमाबाईंचे क्रांतिकारी विचार आचरणात आणण्यासाठी देवकीला लग्नबंधनात न अडकवता पुढे शिकवावे, अशी तिलोत्तमाची इच्छा असते. नैनचंद आयुष्यात पहिल्यांदाच तिलोत्तमाला कडाडून विरोध करतो. नवऱ्याच्या आग्रहापुढे आणि समाजाच्या रीतीरिवाजांपुढे पंडिता रमाबाईंच्या विचारांचा आधार तिलोत्तमाला पुरेसा पडत नाही. परंपरा आणि आधुनिकता यात संभ्रमित झालेला तिलोत्तमाचा जावई जयेश गोमांस खातो, एका बाहेरच्या स्त्रीबरोबर संबंध ठेवतो आणि एका गोऱ्या ख्रिश्चन मुलीच्याही प्रेमात पडतो. यामुळे आपण नरकात जाणार आणि यातून फक्त येशूच वाचवू शकेल, या भावनेतून ख्रिस्ती होतो. तरीही आपली इंग्रज प्रेयसी शेवटी म्लेंच्छ, म्हणून अशुद्ध अशी त्याची भावना असते. त्याने आपल्या लेकीला सोडून देऊ नये, म्हणून तिलोत्तमा देवकीलाही ख्रिश्चन धर्माची दीक्षा देते. पुढे जयेशचे काका त्याच्याबरोबरचे संबंध अधिकृतपणे तोडून टाकण्यासाठी घटश्राद्ध विधी करायचे ठरवतात. यावर तिलोत्तमाचा भडका उडतो. 'काय ही राक्षसी चाल आणि माझ्या मुलीचे काय? तिला तुम्ही विधवा बनवणार का?' असा सवाल ती करते. कुमाऊँ परिसराची वर्णने, पात्रांचे जिवंत आणि रसरशीत चित्रण, ऐतिहासिक व काल्पनिक घटनांची बेमालूम सरमिसळ, यामुळे ही कादंबरी अत्यंत वाचनीय होते.

थिंग्ज टू लीव्ह बिहाइंड

लेखिका - नमिता गोखले

प्रकाशक - पेंग्विन व्हायकिंग



मटाचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

Report Page